जिंदगी ना मिलेगी दोबारा....

 जिंदगी ना मिलेगी दोबारा....


या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे



आपले जीवन ही देवाने आपल्याला दिलेली एक अनमोल भेट आहे. जर आपण आपले आयुष्य दु: खी मनाने किंवा अस्वस्थ होऊन व्यतीत करू असू तर आपण देवानं दिलेल्या या अनमोल भेटीकडे दुर्लक्ष करत आहोत. म्हणूनच, जीवनातील परिस्थिती कशीही असो आणि आपल्याला कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी आपण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण जीवनाचे दुसरे नावच ‘संघर्ष’ आहे.


जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल.

जीवन ही रंगभूमीसारखे आहे. जीवन म्हणजे दोन घडीचा डाव, जीवन हा एक संघर्ष आहे, जीवनाच अशा अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केल्या आहेत. आपले जीवन हा एक अनुभवप्रवाह आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे त्याला स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार असणार. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे सार्थक आहे.


"एवढ्याशा आयुष्यात खूप काही हवं असतं,

हवं असतं तेच मिळत नसतं,

हवं ते मिळालं तरी खूप काही कमी असतं,

चांदण्यांनी भरुनसुध्दा आभाळ आपलं रिकामं असतं"


खरे म्हणजे जगण्याइतके आनंददायक असे जीवनात काहीच असू शकत नाही. सर्व कला, क्रीडा, साहित्य, संगीत, शास्त्र संशोधन हे जीवनाचे विलास आविष्कार आहेत. त्यात जे रस घेतील त्यांना सविकल्प समाधीचे सुख लाभेल. हे सहज सौख्य माणसे विसरतात. खेळीमेळीच्या वातावरणात, विचारांच आकाशात आपापल्या मतांचे पतंग सोडावेत आणि प्रसंगी काटावेत, पण हा ऐश्र्वर्यछंद रंगपंचमीप्रमाणे सुखद सोहळाच ठरावा.


जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे. तिचा चांगला उपयोग करणे महत्त्वाचे आहे. माणसाने केवळ क्षुल्लक दु:खाने व्यथित होऊन त्याचा शोक करत बसू नये. त्याने एखाद्या आंधळ्याचा डोळा व्हावे, लंगडय़ाचा पाय व्हावे, अनाथाला पालकसुध्दा व्हावे, दुसर्‍याला आनंद द्यावा, दुसर्‍यासाठी जगावे.


जगावे, जगू द्यावे, जगता-जगता जीवनाकडे पाहावे, जमेल तेवढे जाणावे या जाणिवेचे गाणे गुणगुणत पुढे जात राहावे, स्वत:ला विसरून अवैयक्तिक पातळीवरुन जीवन वैभवाचा स्पर्श अनुभवावा.


"जीवनगाणे गातच रहावे

झाले गेले विसरुन जावे, पुढे पुढे चालावे"


माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा आणि प्रयत्नपूर्वक आनंदी जीवन जगावे. हे जग सुंदर व्हावे, यासाठी या जगात जाणीवपूर्वक व जाणतेपणाने राहावे व रमावे. अशा जगण्यात जिवाचा गौरव आहे. माणसांजवळ विचारशक्ती आहे. आचारशक्ती आहे, सदबुद्धी आहे. एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटेपणा निपटून काढला व साधे, सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम शिवम सुंदरम असे जीवनब्रह्मचे रूप आपण सतत अनुभवत राहू. निरभ्र आणि अथांग आकाश, सूर्य, चंद्र यांचे औदार्य, सतत खळखळणारे लहानांचे हसणे, पायाशी घोटाळणार्‍या कुत्र्याचे इमान, थोडे प्रेमाचे बोलणे केले की वृध्दांच्या नेत्रात तरळणारे अश्रू, एखादा रुपया हातावर ठेवला तर चार पिढय़ांना आशीर्वाद देणारा देवाच्या दारातील विकलांग, पहाटेच्या प्रहरी मंदिरातून येणारा घंटानाद, आभाळातून झेपावत जाणारे पाखरांचे थवे, शाळेच्या प्रांगणात बाळगोपाळांच्या कंठातून बाहेर पडणारे प्रार्थनागीत..शाळेतील किलबिलाट अशा अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन किती विलोभनी आहे.


जीवनातील अशा कितीतरी गोष्टी आपल्याला जगण्यासाठी उत्साह देतात. प्रेरणा देतात म्हणूनच आपणही प्रतिभासंपन्न कवी मंगेश पाडगावकर यांच्या सुरात सूर मिसळून म्हणूया -

 ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे' 


●एकदा का चाळिशी पार केली की "जास्त शिकलेला" आणि "कमी शिकलेला" दोघेही सारखेच ...


(कमी शिकलेला कदाचित जास्त पैसे कमावत असेल)


●पन्नाशी नंतर तर "सुंदर" आणि "कुरूप" हा भेदभावच नष्ट होतो....दोन्ही सारखेच 


(कोण कितीका सुंदर असेना या वयात सुरकुत्या, डोळ्यांभोवतालची काळी वलये लपता लपत नाही )


●साठी नंतर तर "मोठी पोस्ट" आणि "लहान पोस्ट" असेही काही उरत नाही....दोन्ही सारखेच


(निवृत्तीनंतर तर ऑफीसातला प्यूनदेखील साहेबाला बघायचे टाळतोच.)


●सत्तरी पार केल्यानंतर "मोठे घर" आणि "लहान घर" असा विचार सुद्धा मनात येत नाही....दोन्ही सारखेच


(सांधेदु:खी बळावून हालचाल करणे मुश्किल झाले कि बसण्यापूर्ती जागा असली तरी पूरे.)


●ऐंशी नंतर गाठीशी "भरपूर पैसा" असला काय अन् नसला काय.... दोन्ही सारखेच


(जरी पैसा खर्च करावासा वाटला तरी स्वतःसाठी कुठे अन् कसा खर्च करावा हा मोठा प्रश्न ऊरतोच )

●नशीबाने नव्वदी पार केली (अभिनंदन) तर "झोपणे" आणि "उठणे" यांत सुद्धा फरक राहत नाही...दोन्ही सारखेच

(कारण उठून बसल्यावर आता करायचे काय हा गहन प्रश्न उरतोच)


जीवन साधे-सरळ-सोपे आहे. आनंदाने जगा...! 

उगाच नेहमी कुठले तरी गहन कोडे सोडवल्याचा आइन्स्टाइनचा आव आणि भाव आणू नका.


एक लक्षात ठेवा...! 


लांब पल्ल्याच्या शर्यतीत आपण सगळे समानच आहोत तेव्हा मित्रांसोबत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत निर्भेळ आनंद लुटा, हसा आणि इतरांनाही हसवा


स्वतःसाठी थोडा वेळ देऊन जगायला शिका, कारण...... जिंदगी ना मिलेगी दोबारा


संकलन- सुनील बडगुजर जळगाव